सा. क्रांतिवीर..न्यायडोंगरी ग्रामपंचायतीवर 'भगवा'च फडकणार.!
नांदगाव-: संतोष कांदे
तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची उद्या (दि.८) रोजी निवडणूक होत आहे.पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना नेते विलास आहेर यांचा गट पुरेसे संख्याबळ जमवू शकत असल्याने ; व काँग्रेसचे माजी आमदार अड. अनिल आहेर गट तटस्थ राहिल्याने दुसरा सरपंच ही शिवसेनेचाच होणार असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
याबाबत अधिक असे की,गेल्या ७५ वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर काँग्रेसची पर्यायाने आहेरांचीच सत्ता होती.मात्र तीन-साडे तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी येथील शिवसेनेचे उदयोन्मुख नेतृत्व शशिकांत मोरे यांच्या हाती सत्ता सोपवली.साधारणतः एक ते दिड वर्ष कारभार केल्यानंतरच्या काळात अचानक काँग्रेसच्या विलास आहेर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.वास्तविक विलास आहेर शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेची ताकद न्यायडोंगरी मध्ये वाढणे अपेक्षित होते,मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून गटाची उमेदवारी विलास आहेर यांच्या मातोश्री विजयाताई आहेर यांना देण्यात आली.आणि त्यावेळेस ग्रामपंचायतीचे सरपंच असलेल्या मोरे यांनी आहेर यांना मदत करून ग्रामपंचायतीची निर्विवाद सत्ता चालवणे सहज शक्य होते,मात्र मोरे यांनी बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराला अडचणीत आणले.काँग्रेसच्या कु.अश्विनी आहेर विजयी झाल्या.
या पराभवाचे शल्य म्हणून की,काय विलास आहेर यांनी मग शिवसेनेची सत्ता असूनही,मोरे गटाला कायम अडचणीतच आणले,आणि येथे काँग्रेस विरोधक असल्याने त्यांची भूमिका साहजिकच विरोधकांचीच होती.या तीन वर्षांच्या कार्यकाळात दाखवता येईल,असे एकही काम सरपंच गायत्री मोरे करू शकल्या नाहीत.परिणामी त्यांनी राजीनामा दिला आहे.
अड. अनिल आहेर यांच्याकडे ५,विलास आहेर यांच्याकडे ७,आणि शशिकांत मोरे यांच्याकडे ५ असे संख्याबळ असल्याचे सांगितले जात असले तरी,'सरपंच'शिवसेनेचाच होणार हा विलास आहेर यांचा दावा आहे.मग बहुमतासाठी ९ सदस्यांची आवश्यकता असताना विलास आहेर यांच्या गळाला लागलेले ते २ दोन सदस्य कुठल्या गटाचे.? या बाबत विविध चर्चा रंगल्या आहेत.
माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी मात्र या निवडणुकीत तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका त्यांच्या प्रगल्भ राजकारणाची साक्ष आहे.त्यांच्या मते येथील जनतेने तीन वर्षांपूर्वी काँग्रेस ला पर्यायाने 'आहेरांना नाकारले आहे.आणि सत्ता काळ आता अवघा अडीच वर्षाचा राहिला आहे,आणि समस्या जैसे थे आहे,आणि विविध करापोटी जमा होणारी थकबाकी वाढत चाललेली आहे.नियोजन केले नसल्याने पाणी प्रश्न बिकट झालेला आहे.आणि येथील जनतेने शिवसेनेकडे पाच वर्षांची सत्ता सोपवली असल्याने अजून दिड वर्ष थांबून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तर शशिकांत मोरे गटाचे ५ सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे बोलले जात आहे.म्हणजेच शिवसेनेच्याच दोन गटात वर्चस्वाची ही लढाई रंगते की काय.? या बाबत ही चर्चा रंगली आहे.
न्यायडोंगरी गटाला पंचायत समितीचे सभापतीपद,उपसभापतीपद,अन दुसऱ्या टर्मचे न्यायडोंगरी ग्रामपंचायतीचे सरपंच हस्तगत केल्यानंतर शिवसेनेतले बापूसाहेब कवडे यांच्यानंतरचे दुसरे किंगमेकर विलास आहेर ठरणार आहेत.
Comments
Post a Comment