सा. क्रांतिवीर...............तेल गेले...अन तूप ही.!
विवाहेच्छूक तरुणांची अशी ही फसवणूक.नांदगाव तालुक्यातील प्रकार
नांदगाव -----संतोष कांदे
लग्न मंडपातून किंवा विवाहास काही अवधी शिल्लक असल्याच्या कालावधीत वधू किंवा वर पळून गेल्याच्या घटना अनेक घडल्या आहेत,मात्र सध्या वधू मिळत नसल्याच्या भावनिक मुद्याचा फायदा घेत विवाहयोग्य तरुणीचा वापर करत नांदगाव तालुक्यातील पोखरी येथील तरुणाला लाखो रुपयांना गंडवले गेल्याची तक्रार दाखल झाल्याने मध्यस्थ मावशीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तालुक्यातील पोखरी येथील बाबुराव देवरे यांचा मुलगा भगवान याच्या विवाहासाठी वधूसंशोधन सुरु होते. पण मुलगी मिळत नसल्याने चांदोरा येथील सोमनाथ भुरक याने देवरे यांना मराठवाड्यातील जालना, परभणी भागातील मुलगी सुचविली. त्यानुसार गेल्या 8 एप्रिलला मनमाडच्या रेल्वे स्थानकावर मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाला. आश्विनी नामक या मुलीसोबत अनिल, मुलीची मावशी व छाया नावाची बहीण त्यासाठी आलेले होते.
मुलगी पसंत पडली नाही तर मनमाड येथूनच वधूवरांच्या दोघं बाजूची मंडळींनी परत जायचे असे ठरले व मुलगी पसंत पडली तर मध्यस्थिंना घसघशीत रक्कम द्यायची असा सौदा ठरला. मुलाला मुलगी पसंत पडली म्हणून लगेचच लग्न लावून टाकायचे असा बेत ठरला त्यानुसार वऱ्हाडी पोखरीला पोहचले. वधू अश्विनीच्या अंगावर सहा हजार रुपयाचे सोन्याचांदीचे दागिने वराचे वडील बाबुराव यांनी घेतले. त्यानंतर अनिल काका, मावशीबाई यांना ठरल्याप्रमाणे एक लाख २० हजार रुपये देण्यात आले. मध्यस्थी करणारा सोमनाथ भुरक, बळीराम चव्हाण, बाबुराव देवरे, भाऊसाहेब नागरे यांच्या साक्षीने रक्कम देण्यात आली.
अशा रीतीने एकदाचे शुभ मंगल पार पडले त्याच्या दोन दिवसांनी नव्या नवरीला पहिले मूळ लावण्यासाठी नववधूचा मेहुणा संजय मोरे दुचाकीवरून तिला घेण्यासाठी आला. त्याचेही आदरातिथ्य करण्यात आले दोन दिवसांनी मुलीला घेऊन जा असे सांगत संजय मोरेने औरंगाबादचा पत्ता दिला. आंबेडकर नगर, गल्ली नंबर ४ मुकुंदवाडी या पत्त्यावर अश्विनीला आणण्यासाठी मुलाचे वडील गेले पण पत्ता चुकला गल्ली नंबर चार त्या भागात नव्हती मग दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला मुलगी देण्याऐवजी दुसरी मुलगी आणून देतो असे त्यांना सांगण्यात आल्याने आपण फसविले गेल्याचे देवरे यांच्या लक्षात आले.
एव्हाना तोवर उशीर झालेला होता. पोलिसात तक्रारीचा अर्ज व लग्नाचे फोटो देण्यात आले होते. मात्र, शोध काही केल्या लागत नव्हता मध्यस्थ असलेल्या इसमाने उडवाउडवीचे उत्तरे देणे सुरू केले. मग हा प्रकार गंगाधरी येथील सामाजिक कार्यकर्ते भगीरथ जेजुरकर यांना समजताच त्यांनी व मुलाच्या मामाने शक्कल लढवीली त्यांनी मनमाडच्या अमोल कुलकर्णी व शिलास पठाडे यांच्या मदतीने सापळा रचला त्यासाठी गोड बोलत आपल्याकडील एका मुलांसाठी मुलगी शोधत असल्याचे बतावणी केली. त्यानुसार साडे सहाच्या सुमाराला औरंगाबाद हुन सुनीता पाटोळे हिला तिच्यासोबत असलेल्या अन्य एका महिलेसह कुलकर्णी व पठाडे यांनी ताब्यात घेतले. आधी मनमाड पोलीस स्टेशन व त्यांनतर नांदगाव पोलीस स्थानकात आणण्यात आले. पोलिस निरीक्षक बशीर शेख व हवालदार रमेश पवार घटनेचा तपस करीत आहेत. बायको मिळत नसलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अशा प्रकारची मोडस अपरेंडी करणाऱ्या टोळीपर्यंत पोहचण्यासाठी आजच्या घटनेतून प्रकाश झोत पडू शकतो.
Comments
Post a Comment