सा. क्रांतिवीर....नांदगाव शहरातील अतिक्रमणाला शिस्त कोण लावणार.?
नांदगाव----संतोष कांदे
हातगाडी किंवा पथारी अंथरून त्यावर किरकोळ वस्तू विक्री करत सायंकाळची चूल पेटवणाऱ्याकडून झालेले शहरातील अतिक्रमण एकवेळ समजले जाऊ शकते,मात्र त्यांनी अतिक्रमण केले,आणि आपले तर हक्काचे दुकान आहे,केवळ या भावनेने खुद्द दुकानदारांनीही रस्त्यावर अतिक्रमण थाटल्याने आता सर्वच अतिक्रमण काढून नागरिकांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.नवनियुक्त मुख्याधिकारी हा प्रश्न मार्गी लावतील का.? असा सवाल नांदगावकर करत आहेत.
या बाबत अधिक असे की,शहरातील रेल्वे गेट ते महात्मा गांधी चौक,समता मार्ग,भोंगळे रोड आदी वर्दळीच्या रस्त्यावर ह्या विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे.चारचाकी वाहन असो वा दुचाकी या रस्त्यावरून चालवणे एक दिव्य असल्याचा भास पदोपदी होत असतो.तर पायी चालणाऱ्यांना मोठी कसरत या रस्त्यावरून चालताना करावी लागते.
हातावर पोट असणाऱ्यांचा नाईलाज एकवेळ समजला जाऊ शकतो,पण त्यांनी केले,म्हणून स्वतःचे दुकान असतानाही दुकानासमोर अतिक्रमण करून रस्ता अडवणाऱ्या दुकानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अतिक्रमण विषय चिंतेचा झाला आहे.एकमेकांकडे बोट दाखवत अतिक्रमण चा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसतो.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते अतिक्रमण हा विषय नगरपालिकेच्या अखत्यारीतला आहे,मात्र हे अतिक्रमण काढण्यासाठी त्यानी बंदोबस्त मागितला तर नक्की देऊ.!
या हातगाडी वर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना शहरालगतचे एखादे मोकळे पटांगण उपलब्ध करून तेथे त्यांची सोय केली,अन दुकानदारांना दुकानासमोर अतिक्रमण केल्यास दंड किंवा परवाना निलंबित करण्याची तजवीज केली तर मोठा प्रश्न सुटू शकतो.त्यासाठी नवनियुक्त मुख्याधिकार्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.
Comments
Post a Comment