सा. क्रांतिवीर..पावसाळ्यापूर्वीच रासायनिक खते विक्रेत्यांकडून अडवणूक.!
अनुलोम कार्यकर्ता टीम ची तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार
नांदगाव---संतोष कांदे
वेळेवर अडचण नको,म्हणून रासायनिक खते घेऊन ठेवण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो.तर पेरणीस सुरुवात झालेली नसताना रासायनिक खते विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट व अडवणूक होत असल्याची तक्रार अनुलोम कार्यकर्ता टीमच्या शेतकऱ्यांनी नांदगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
या बाबत अधिक असे की,शहरात व तालुक्यात अनेक कृषी निविष्ठा केंद्र सुरू आहेत.या विविध कृषी केंद्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे.वेळेवर आर्थिक उपलब्धता किंवा कृत्रिम टंचाई ला तोंड द्यावे लागू नये,म्हणून शेतकरी बांधव पेरणीपूर्व रासायनिक खते घेऊन ठेवतात.मात्र अजून पाऊस नसल्याने पेरणीस प्रारंभ झालेला नाही,तरीही अनेक कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांना युरिया खताबरोबर दुसरे खत घेण्याची सक्ती केली जात आहे,तसेच युरिया ची निर्धारीत शासकीय दराने विक्री न करता ३० ते ४० रुपये अधिक घेऊन विक्री केली जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
रासायनिक खतांची विक्री आधार कार्ड किंवा पॉस मशीनवर थंब घेऊन करावी,असे शासकीय आदेश असताना या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.याऐवजी कच्ची पावती देऊन हा कारभार सुरू आहे.या तक्रारीची प्रत नांदगाव तहसीलदार व पोलीस स्टेशनला ही देण्यात आली आहे.या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी पिंपरखेड येथील अनुलोम वस्ती मित्र गोरख जाधव,अनुलोम स्थान मित्र शिवाजी जाधव (चांदोरा) यांनी केली आहे.
Comments
Post a Comment