नांदगाव विशेष बातमी
नांदगाव संतोष कांदे
ग्रामीण भागात उपरोधिक स्वरात असे म्हटले जाते की,शिवाजी राजे जन्माला यावेत,पण ते शेजारच्या घरात.! मात्र नांदगाव तालुक्यातील पोही या छोट्याशा खेडे गावात लभाण बंजारा समाजाच्या राठोड कुटुंबीयांनी घरातल्या विधवा सुनेचा पुनर्विवाह करत एक धाडसी निर्णय घेवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
या बाबत अधिक असे की,नांदगाव तालुक्यातील पोही म्हणजे उसतोड कामगारांचे गांव.! वयोवृद्ध वगळता ९० टक्के लोकसंख्या उसतोडीसाठी ६ ते ७ महिने राज्यभरातील त्या-त्या साखर कारखान्यांवर जात असते.आणि उर्वरीत दिवसात हंगामी शेती करतात.अशा या गावात पोपट राठोड यांच्या कुटुंबातील रामदास राठोड याचा हंगामी शेतीची पेरणी करत असताना १० जून २०१७ रोजी वीज पडून मृत्यू झाला.
विवाह होऊन अवघी तीन वर्षे उलटलेल्या रामदास च्या अकाली जाण्याने त्याची सहचारिणी सुरेखा च्या जीवनात या घटनेने अंधकार पसरला.घरची अठरा विश्वे दारिद्र्य.! त्यातच हा आघात,आणि या घरात आपला किती दिवस निभाव लागेल.? या विचाराने चिंताक्रांत झालेल्या सुरेखा च्या मदतीला तिचे सासरे पोपट राठोड,पोलीस पाटील संजय राठोड हे धावून आले.आणि सुरेखाला भक्कम आधार द्यायचा हे ठरवून अविवाहित असलेल्या अरुण चा विवाह सुरेखा शी लावायचा,असे ठरवून बैठक बसली.तिच्या माहेरच्या लोकांनी तर देवदूत अशी उपमा देत या राठोड कुटुंबाचा गौरव केला.
आज दि.१४ रोजी या उभय दांम्पत्याचा विवाह सोहळा जळगाव बुद्रुक येथील बेलेश्वर महादेव मंदिरात पार पडला.या विवाह सोहळ्यासाठी नांदगाव पंचायत समितीच्या सभापती सौ.सुमन विष्णू निकम,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते विष्णू निकम,विस्तार अधिकारी श्री.ढवळे,महिला बाल विकास च्या मुख्य सेविका पाचपांडे, निवृत्त लष्करी जवान नानासाहेब काकळीज,पत्रकार संदीप जेजुरकर,नांदगाव तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
* लभाण बंजारा समाजात विवाहयोग्य मुलांना वधू शोधण्याची कुठलीही अडचण नसताना अविवाहित अरुण ने उचलेले हे पाऊल त्याच्या दूरदृष्टी व महिलांप्रती त्याची आदर भावना व्यक्त करते.अशी प्रतिक्रिया नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच सभापती सौ.सुमन निकम यांनी या जोडप्याचा सत्कार ही केला.
Comments
Post a Comment